मंगळवार, जानेवारी ०५, २०१०

भय इथले संपत नाही !

साधारण एका महिन्यापूर्वी, चीनच्या हूनान प्रांतातल्या एका गावातल्या 1300 मुलांना, रक्तात शिशाचे प्रमाण जास्त झाल्याने, विषबाधा झाली होती. त्या गावात असलेल्या एका मॅन्गनीज शुद्धीकरण कारखान्यामुळे ही विषबाधा झाली होती असे आढळल्यावर, हा कारखाना बंद करण्यात आला होता
 
या घटनेला महिना व्हायच्या आतच, चीनमधील अग्नेय दिशेला असलेल्या फुजियान प्रांतातल्या, लोंजयान शहराजवळच्या, जिओयांग गावातल्या 121 मुलांना अशीच विषबाधा, रक्तात शिशाचे प्रमाण आधिक असल्याने झाली आहे. या खेपेस ही विषबाधा या गावामधल्या ‘हुचिआंग बॅटरी फॅक्टरी’ (Huaqiang Battery Factory) मुळे झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. विषबाधा झाल्याचे कळल्यावर गावकरी संतप्त झाले व त्यांनी रास्ता रोको आंदोलन व निदर्शने केली. गावातील सर्व दुकानांनी कडकडीत हरताळ पाळला. हे झाल्यावर तेथील जिल्हा अधिकारी जागृत झाले व त्यांनी ही फॅक्टरी बंद केली आहे. ही फॅक्टरी सरकारने बंद केली नाही तर आपण गाव सोडून जाऊ अशी धमकी सर्व गावकर्‍यांनी  अधिकार्‍यांना दिली आहे.या फॅक्टरीच्या जवळपासच्या गांवामधल्या शाळांमधली उपस्थिती पूर्ण रोडावली आहे
 
सरकारने या भागातल्या सर्व 14 वर्षांखालच्या मुलांची रक्त तपासणी मोफत करून देण्याचे मान्य केले आहे. विषबाधा झालेल्या मुलांवर सरकारने ताबडतोब सुरू करावेत असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यात झालेली ही तिसरी घटना आहे. जलद गतीने, नियोजन न करता आणि प्रदुषण व पर्यावरणाची हानी याकडे काटेकोरपणे लक्ष न देता, केलेल्या उद्योगीकरणाचे किती भयानक दुष्परिणाम होऊ शकतात याच्या, या तिन्ही घटना साक्षीदार आहेत. पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी सर्व प्रगत राष्ट्रांना, अशा प्रकारचे प्रदुषण निर्माण करू शकणार्‍या उद्योगधंदे, त्यांच्या देशात चालवण्यातले धोके लक्षात आले व त्यांनी सर्व प्रदुषणकारी उद्योग विकसनशील देशांमधे हलवण्याचे धोरण स्वीकारले. नवीन उद्योगधंद्यांना मुक्त वाव देण्याचे चिनी सरकारचे धोरण असल्याने, असे अनेक उद्योग चीन मधे आले. या उद्योगधंद्यांना परवाने देताना पर्यावरण, प्रदुषण या सारख्या बाबींची पूर्तता, फक्त कागदोपत्रीच झाली असावी. प्रत्यक्षात अधिकार्‍यांचे हात ओले करून आपल्याला पाहिजे तशी मनमानी या उद्योगधंद्यांनी केली असावी. चीन मधले उद्योगीकरण आता इतके बेसुमार वाढले आहे की त्यामुळे त्या देशाच्या पर्यावरणाची होणारी हानी वाढत चालली आहे. या पर्यावरण हानीनेच चिनी नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका संभवतो आहे. 28 सप्टेंबर 2009

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: