शनिवार, ऑगस्ट २८, २०१०

वाहतुक मुरंबा -चिनी पद्धतीचा


पंधरा वीस वर्षांपूर्वी म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे नव्हता त्या वेळेला, पुणे-मुंबई प्रवास हा मोठा बेभरवशाचा मामला असे. प्रवासाला किती वेळ लागेल? हे सांगणे कोणालाच शक्य नसे. याचे प्रमुख कारण म्हणजे खोपोली जवळच्या बोर घाटात दररोज होणारा वाहतुक मुरंबा. कधीही बघितले तरी शे पाचशे ट्रकची धुडे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी किंवा मुंगीच्या पावलांनी पुढे सरकताना दिसत. एक दोन वेळा तर पाच सहा तास या घाट रस्त्यावर अडकून पडल्याचेही मला चांगलेच स्मरते आहे

चीनची राजधानी बिजिंग मधून 110 नंबरचा एक्सप्रेस वे, वायव्येला असणार्‍या हेबेई प्रांतातल्या झांगजियाकाऊ (Zhangjiakou in Hebei Province) शहरापर्यंत जातो. बिजिंग शहराच्या अगदी उत्तरेला असलेला या रस्त्याचा भाग चांगपिंग या बिजिंग म्युन्सिपालिटीच्या एका प्रभागात मोडतो. हाच रस्ता नंतर पश्चिमेला वळतो व त्यानंतर या रस्त्याला बिजिंग-तिबेट हायवे असे नाव दिलेले आहे. बिजिंग जवळ असलेल्या रस्त्याच्या या भागावर नेहमीच काहीतरी बांधकाम चालू असते. त्यामुळे या भागामधे फक्त 4 टनापर्यंत वजन वाहून नेणार्‍या ट्रक्सना खरेतर परवानगी आहे

प्रत्यक्षात मात्र 8 टनापर्यंत वजन नेणारे ट्रक्स या मार्गावरून बिनधास्तपणे जा ये करताना नेहमीच दिसतात. वाहतुकीचा मुरंबा ही गोष्ट या कारणामुळेच या रस्त्यावर काही नवीन नाही. परंतु मागच्या 14 ऑगस्टपासून सुरू झालेला या रस्त्यावरचा वाहतुक मुरंबा व त्यामुळे झालेला खोळंबा यांना अभूतपर्व म्हणावे लागेल

चीन ही जगातील दोन नंबरची आर्थिक महासत्ता झाल्याची ग्वाही मागच्या आठवड्यात वृत्त माध्यमांनी दिली होती. 14 ऑगस्टचा वाहतुक मुरंबा या नव्या स्थानाला साजेसा आहे यात शंकाच नाही. बिजिंग आणि हेबेई प्रांतातल्या हुआईआन व इनर मंगोलिया प्रांतातल्या जिनिंग पर्यंत 100 किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा 19 ऑगस्टपर्यंत तयार झाल्या होत्या. एवढा मोठा मुरंबा झाल्याने अनेक वाहने साहजिकच बंद पडली व छोटे छोटे अपघात रस्त्यावर होऊ लागले. यामुळे या मुरंब्यात भरच पडली आहे. 110 क्रमांकाच्या हायवेवर जे बांधकाम चालू आहे त्यामुळे या रस्त्याची वाहनक्षमता खूपच मर्यादित झाली आहे असे एका वाहतुक अधिकार्‍याचे म्हणणे असल्याचे ग्लोबल टाईम्स ही चिनी वृत्तसंस्था म्हणते


या वर्षी कोळसा व फळे यांची वाहतुक करणार्‍या ट्रक्सच्या संख्येत खूपच वाढ झाली आहे. या वाढत्या रहदारीला तोंड देण्यासाठी ट्रक्सनी दुसर्‍या बाह्य रस्त्यांचा उपयोग केला पाहिजे असे त्यांना सरकारकडून सांगण्यात येते. परंतु हे ऐकण्याच्या मनस्थितीत फारसे ट्रक ड्रायव्हर दिसत नाहीत. होहहोत(Hohhot) पासून टिआनजिन( Tianjin) ला कोळसा घेऊन जाणारा वॅन्ग़ या ड्रायव्हरकडे यासंबंधी एका वृत्त वार्ताहराने चौकशी केली असता मी लांबच्या रस्त्याचा वापर करून माझे जास्त इंधन का खर्च करू? व जास्त टोल का म्हणून भरू? असेच त्या वार्ताहराला सांगितले. हुआईआन जवळ रस्त्यावर ट्रक उभा करून शांतपणे बसलेला हुआंग हा एक ड्रायव्हर म्हणतो की खोळंब्यापेक्षा आम्हाला इथे रस्त्यावर जे अन्नपदार्थ विकले जातात त्यांच्या विक्रेत्यांचाच त्रास व राग जास्ती येतो आहे. हे विक्रेते इन्स्टन्ट नूडल्स नेहमीच्या पेक्षा चौपट किंमतीला आम्हाला विकत आहेत. या रस्त्यावर मागचे 3 दिवस व 2 रात्री हा ड्रायव्हर अडकून पडला आहे. तो इतर ड्रायव्हर्सबरोबर पत्ते किंवा जुगार(Mohong) खेळण्यात किंवा नुसते वाट बघत बसून वेळ घालवतो आहे


सरकारने 400 च्यावर जादा पोलिस अधिकार्‍यांना 24 तास या रस्त्यावर बंदोबस्तासाठी पाठवले आहे. याशिवाय सरकार फारसे काही करू शकेल असे दिसत नाही. परंतु हा वाहतुक मुरंबा कमी हो ऊन वाहतुक परत सुरळित सुरू होण्यासाठी किमान महिना तरी लागेल असे तज्ञ म्हणतात. Institute for Urban and Environmental Studies at the Chinese Academy of Social Sciences. या संस्थेचे संचालक निऊ फेन्ग्रुई हे म्हणतात की चीनमधे रस्त्यावर वाहतुक मुरंबा नाही ही खरे म्हणजे एक बातमी होऊ शकते, इतकी परिस्थिती वाईट आहे. रस्त्यांचे नियोजन व कामाचा दर्जा अतिशय नित्कृष्ट आहे. नवी बांधकामे पूर्ण करण्याचा वेगही अतिशय मंद आहे

रस्त्यावरचा वाहतुक मुरंबा साफ करण्यासाठी एक महिना लागणार हे वाचून सुद्धा मला गरगरल्यासारखे झाले. भारतातल्या रस्त्यांवरची परिस्थिती यापेक्षा काही फार जास्त चांगली आहे असे म्हणता येणार नाही. रस्त्याचे नियोजन आणि भविष्यकालात काय घडू शकेल याचा अयोग्य अंदाज हे या परिस्थितीला प्रमुखतेने कारणीभूत आहेत असे वाटते. आपल्याकडच्या नियोजकांनी योग्य योजना बनवून ती कार्यवाहीत आणणे किती महत्वपूर्ण आहे हे या चीनमधल्या उदाहरणाने स्पष्ट केले आहे.
28 ऑगस्ट 2010
(या घटनेची बातमी मला माझे एक वाचक श्री स्मित गाडे यांनी ई-मेलद्वारे पाठवली होती त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. )

































शुक्रवार, ऑगस्ट १३, २०१०

वुहान मधले कचर्‍याचे ढीग


पुण्याच्या महानगरपालिकेविषयी पुणेकरांच्या ज्या तक्रारी असतात त्यात महानगरपालिकेचा सफाई विभाग कचरा लवकर उचलत नाही. कचर्‍याचे ढीग शहरात साठून राहतात वगैरे तक्रारी सर्वात जास्त प्रमाणात असतात. एका अर्थाने ते बरोबरही आहे. रस्त्याच्या कडेला मोठमोठे कचर्‍याचे ढीग साठून राहिले आहेत. दुर्गंधी येते आहे वगैरे दृष्ये कोणत्या सुजाण नागरिकाला आवडतील?
चीनच्या होंगशान जिल्ह्यामधल्या वुहान या शहराच्या एका उपनगरामधे कचर्‍याचे जे ढीग मध्यंतरी साठले होते त्याची चित्रे मला आंतरजालावर बघायला मिळाली. या चित्रापुढे पुण्यातले कचर्‍याचे ढीग म्हणजे अगदीच फुसकट आहेत असेच वाटू लागले

 
Wang Haofeng Focus Times या वृत्तपत्राच्या वार्ताहराने या कचर्‍याच्या ढिगांना भेट दिल्यावर केलेले वर्णन त्याच्याच शब्दात ऐकण्यासारखे आहे. तो म्हणतो की " ज्यांना काही शेवटच नाही असे न संपणारे कचर्‍याचे ढीग गावात प्रवेश करताना नदीच्या काठावर साठलेले आहेत. अतिशय दुर्गंधी व कचर्‍यातील जळणार्‍या प्लॅस्टिकमुळे काळा धूर व राख ही वार्‍याबरोबर शहरात पसरते आहे. या शहरात राहणारे रहिवासी, स्त्रिया, मुले व विद्यार्थी य़ांना अतिशय त्रास होत असल्याने त्यांच्या डोळ्यातून पाणी येते आहे. सायकल व मोटर सायकल चालवणारे या रस्त्यावरून जाताना डोळे बंद करून जात आहेत. बाकी मागे बसलेले लोक किंवा पायी जाणारे लोक हे अंगावरच्या कपड्यांनी आपले नाक व तोंड झाकून घेत आहेत
 
रस्त्यावर येणार्‍या धुराच्या लोटांमधून जाताना लोक पळ काढून पलीकडे जात आहेत. हिरवे डोके असलेल्या माशा कचर्‍याच्या ढिगाभोवती घोंघावताना दिसत आहेत.”
 

या वार्ताहराच्या भेटीनंतर या कचर्‍यांच्या ढिगांना एवढी प्रसिद्धी मिळाली की वुहानमधले अधिकारी एकदम जागे झाले व त्यांनी JCB सारखी बांधकाम यंत्रे या ठिकाणी आणून कचरा उचलला व तेथे माती टाकली
 
आता किती दिवस ही स्वच्छता राहणार हा ही प्रश्नच आहे.
13 ऑगस्ट 2010

रविवार, ऑगस्ट ०८, २०१०

रोख भरणा


चीनच्या हुनान प्रांतातल्या चांगशा या शहरात घडलेली ही कथा आहे. मूळ कथेतली चिनी नावे काढून तिथे भारतीय नावे घातली तर ही भारतातल्या कोणत्याही शहरात घडलेली गोष्ट म्हणून सहज खपेल.
आता मूळ कथेकडे वळूया. या चांगशा शहरात बांधकामाचा व्यवसाय करणारे मिस्टर. पेंग हे बांधकाम व्यावसायिकांच्या एका बॅन्केमधे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी दुपारचे 3 वाजले होते व बॅन्क बंद होण्याची वेळ जवळ आल्याने बॅन्केत बरीच गर्दी होती. मिस्टर पेंग निमुटपणे रांगेत उभे राहून आपली पाळी येण्याची वाट पाहू लागले.
बर्‍याच काळाने मिस्टर पेंग यांची पाळी आली व ते टेलरच्या खिडकीसमोर उभे राहले. त्यांनी टेलरला आपला खाते क्रमांक सांगितला. तो टेलरने संगणकात टंकित केला व पुढे काही तो विचारणार एवढ्यात त्याचा मोबाईल फोन वाजला. तो टेलर कोणाशी तरी दोन शब्द बोलला व एकदम उठून पलीकडच्या बाजूला गेला व एका व्यक्तीशी बोलू लागला. 5 मिनिटे गेली, 10 मिनिटे गेली तरी त्याचे बोलणे काही संपेना. मिस्टर पेंग अतिशय अस्वस्थ झाले कारण त्यांना अजून बरीच कामे करावयाची होती. तो टेलर येण्याचे काही लक्षण न दिसल्याने मिस्टर पेंग यांनी बाजूच्या टेलरला आपल्याला पैसे देण्याची विनंती केली. परंतु शेजारच्या टेलरने त्यांच्याकडे लक्षच दिले नाही व जेंव्हा मिस्टर पेंग यांनी त्याला दोन तीन वेळा विनंती केली तेंव्हा तो त्यांच्यावरच उखडला. " तुम्हाला दिसत नाही का मी कामात आहे ते?" जरा वेळ वाट बघा. मिस्टर पेंगना चरफडत वाट बघण्याशिवाय काही करता येत नसल्याने ते भयंकर भडकले.
आणखी काही वेळानंतर मिस्टर पेंग यांच्या खिडकीसमोरचा टेलर परत जागेवर येऊन बसला व त्याने मिस्टर पेंग यांना काय पाहिजे अशी पृच्छा केली. " मला 50000 युआंन काढायचे आहेत." पेंग यांनी मागणी केली. यावर या टेलरने, बॅन्केच्या नियमाप्रमाणे आगाऊ सूचना दिल्याशिवाय 50000 युआनपेक्षा जास्त रोख रक्कम देण्याबाबत आपली असमर्थता व्यक्त केली. आता मात्र मिस्टर पेंग चांगलेच तापले. " मी 50000 युआन मागतो आहे. ते 50000 पेक्षा जास्ती कुठे आहेत?" मिस्टर पेंग यांचे म्हणणे. "मिळणार नाहीत." इति. टेलर

मिस्टर पेंग आता मात्र भलतेच गरम झाले होते. त्यांना काय करावे ते सुचेना. शेवटी त्यांनी त्या टेलरलाच धडा शिकवायचे ठरवले. "ठीक आहे 49000 युआन द्या." टेलरने तेवढी रक्कम व पावती मिस्टर पेंग यांच्या हातात ठेवली. आता खिडकीसमोरून बाजूला होण्याऐवजी मिस्टर पेंग तेथेच उभे राहिले व त्यांनी 100 युआन ची एक नोट टेलरला दिली व ती आपल्या खात्यात भरायला सांगितली. चीन मधे रक्कम बॅन्केत भरताना स्लिप भरावी लागत नाही. टेलरच तुम्हाला बॅन्केची पावती देतो. टेलरने रक्कम जमा करून घेतली व पावती दिली. मिस्टर पेंग यांनी दुसरी 100 युआन ची नोट पुढे केली व रक्कम खात्यात भरायला सांगितली. हा प्रकार बराच वेळ चालला. पेंग यांच्या हातात आता 30 पावत्या दिसू लागल्या. एव्हाना बॅन्केच्या मॅनेजर पर्यंत या युद्धाची बातमी पोचली व तो केबिन मधून धावत बाहेर आला व त्याने हा प्रकार थांबवण्याची टेलरला विनंती केली. परंतु टेलरही आता हट्टाला पेटला होता व हे युद्ध चालू ठेवण्याची त्याची तयारी दिसत होती. शेवटी मॅनेजरने आपला अधिकार वापरून टेलरची आतमधे बदली केली व हे युद्ध थांबले.
आपल्या हातातल्या 30 पावत्या दाखवत टेलर यांनी मॅनेजरला सांगितले की उद्या मी माझ्या सर्व सहकार्‍यांना प्रत्येकी 10000 युआन देऊन बॅंकेत घेऊन येतो व दिवसभर आम्ही रोख रक्कम भरणा व पैसे काढणे हेच करत राहणार आहोत. बॅन्क मॅनेजरला आपले सर्व कौशल्य वापरून व चहापाणी करून मिस्टर पेंग यांची समजूत काढावी लागली. मिस्टर पेंग बॅन्केतून अखेरीस बाहेर पडले खरे. पण त्यांचा राग काही कमी झाल्यासारखा दिसत नव्हता.
8 ऑगस्ट 2010